Saturday, July 25, 2026

प्रत्येकाने इच्छापत्र का तयार करावे? – इच्छापत्राची मूलभूत माहिती आणि त्याचे महत्त्व (भाग १)

 


प्रत्येकाने इच्छापत्र का तयार करावे? – इच्छापत्र म्हणजे काय, ते का आवश्यक आहे आणि कोणासाठी आहे?

इच्छापत्र म्हणजे काय? ते कोणासाठी आवश्यक आहे? इच्छापत्र तयार केल्याने आपल्या कुटुंबाला कोणते फायदे होतात? या सहा भागांच्या लेखमालेच्या पहिल्या भागात जाणून घ्या इच्छापत्राची मूलभूत माहिती.

अनेकजण इच्छापत्र करण्याचा विषय जाणीवपूर्वक टाळतात. काहींना तो गुंतागुंतीचा वाटतो, तर काहींना त्याची गरज फक्त वयोवृद्ध किंवा श्रीमंत लोकांनाच असते असे वाटते. प्रत्यक्षात, आपल्या कुटुंबाचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी आणि आपल्या पश्चात त्यांना अनावश्यक कायदेशीर अडचणींपासून वाचवण्यासाठी इच्छापत्र तयार करणे हा प्रत्येकाने घ्यावयाच्या सर्वात महत्त्वाच्या निर्णयांपैकी एक आहे.

हा इच्छापत्रावरील सहा भागांच्या लेखमालेतील पहिला लेख आहे. या लेखमालेत इच्छापत्र म्हणजे काय, ते का आवश्यक आहे, त्यात कोणत्या गोष्टींचा समावेश असतो, ते कसे लिहावे, इच्छापत्र नसल्यास काय अडचणी येऊ शकतात, लिव्हिंग विल, उत्तराधिकाराचे कायदे आणि शेवटी MS Word मधील इच्छापत्राचा नमुना याविषयी माहिती घेणार आहोत.

या लेखमालेच्या शेवटच्या (भाग ६) मध्ये MS Word मधील इच्छापत्राचा नमुना दिला जाईल. त्याची लिंक येथे दिली जाईल.

ही लेखमाला केवळ माहितीपर असून ती कायदेशीर सल्ला नाही. तुमच्या विशिष्ट परिस्थितीसाठी कृपया तुमच्या वकिलांचा सल्ला घ्या.

या लेखमालेबद्दल एक छोटीशी नोंद

मराठीत "मृत्युपत्र" हा शब्द पारंपरिक कायदेशीर संज्ञा म्हणून वापरला जातो. मात्र या लेखमालेत आपण "इच्छापत्र" हा शब्द वापरणार आहोत. दोन्ही शब्दांचा कायदेशीर अर्थ एकच असला तरी "इच्छापत्र" हा शब्द अधिक सकारात्मक, आपुलकीचा आणि कमी धाकदायक वाटतो. त्यामुळे संपूर्ण लेखमालेत आपण "इच्छापत्र" हीच संज्ञा वापरणार आहोत.

इच्छापत्र म्हणजे काय?

इच्छापत्र (Will) हा एक कायदेशीर दस्तऐवज आहे ज्यामध्ये तुमच्या निधनानंतर तुमची मालमत्ता (Estate) आणि संपत्ती (Assets) कोणाला, किती आणि कोणत्या पद्धतीने मिळावी हे स्पष्टपणे नमूद केले जाते.

·          तुमच्या इच्छा स्पष्टपणे व्यक्त होतात.

·          तुमच्या प्रियजनांना कमीत कमी कागदपत्रांची पूर्तता करावी लागते.

·          मालमत्तेचे हस्तांतरण सुरळीत होते आणि वाद टाळता येतात.

इच्छापत्र कोणी तयार करावे?

सोपे उत्तर म्हणजे – ज्याच्याकडे कोणत्याही प्रकारची मालमत्ता आहे त्या प्रत्येकाने.

·          तरुण कमावते: उत्पन्न सुरू होताच इच्छापत्र करण्याचा विचार करावा. भविष्यात तुम्ही इतरांच्या इच्छापत्रातील लाभार्थी (Beneficiary) असू शकता आणि त्याचाही विचार करता येतो.

·          ज्येष्ठ नागरिक व निवृत्त व्यक्ती: तुमच्या पश्चात कुटुंबाला मालमत्ता सुरळीत मिळावी म्हणून विलंब न करता इच्छापत्र तयार करावे.

·          गृहिणी: पती, आई-वडील किंवा सासरच्या कुटुंबाकडून भविष्यात मिळणाऱ्या मालमत्तेचाही विचार इच्छापत्रात करणे आवश्यक आहे.

मी भारतीय नौदलात हेलिकॉप्टर वैमानिक (Naval Aviator) म्हणून कार्यरत असताना प्रत्येक नवीन पोस्टिंगच्या वेळी युनिटमध्ये इच्छापत्र सादर करणे आवश्यक असे. त्याच वेळी मला प्रथम इच्छापत्राचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजले.

इच्छापत्र का तयार करावे?

इच्छापत्र तयार करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुमच्या पश्चात तुमच्या मालमत्तेचे काय आणि कसे व्हावे, याचा निर्णय तुम्ही स्वतः घेऊ शकता.

·          इच्छापत्र नसेल, तर हा निर्णय तुमच्या इच्छेनुसार नव्हे तर कायद्यानुसार घेतला जातो. त्यामुळे अनावश्यक कागदपत्रे, विलंब, अतिरिक्त खर्च आणि कौटुंबिक वाद निर्माण होऊ शकतात.

·          तुमच्या कुटुंबाला अनावश्यक कायदेशीर आणि आर्थिक अडचणींपासून संरक्षण मिळते.

·          अल्पवयीन मुलांसाठी पालक किंवा संरक्षक (Guardian) नियुक्त करता येतो.

·          ई-मेल, ऑनलाईन खाती, डिजिटल गुंतवणुका, प्रकाशन हक्क (Copyrights) आणि पेटंट (Patents) यांसारख्या डिजिटल मालमत्तेबाबत स्पष्ट सूचना देता येतात.

·          मालमत्तेचे वाटप स्पष्ट असल्यामुळे भविष्यातील वाद टाळता येतात.

इच्छापत्र नसल्यास तुमच्या मालमत्तेचे वाटप तुमच्या इच्छेनुसार न होता उत्तराधिकाराच्या कायद्यांनुसार (Succession Laws) केले जाते. त्यामुळे अनेक कायदेशीर वारसांच्या स्वाक्षऱ्या आवश्यक होऊ शकतात आणि कागदपत्रांची संख्या वाढते. उदाहरणार्थ, पती-पत्नीच्या संयुक्त मालकीच्या घरावर तुमच्या निधनानंतर परिस्थितीनुसार पत्नी, मुले आणि आई यांचाही कायदेशीर हक्क निर्माण होऊ शकतो. याबद्दल पुढील भागांमध्ये अधिक माहिती पाहू.

इच्छापत्र तयार करणे अवघड असते का?

अजिबात नाही. साध्या कागदावर स्वतःच्या हस्ताक्षरातही इच्छापत्र लिहिता येते. मात्र ते कायदेशीरदृष्ट्या अधिक सक्षम ठरण्यासाठी पुढील बाबी लक्षात ठेवा:

·          दोन साक्षीदारांच्या उपस्थितीत स्वाक्षरी करा. साक्षीदार लाभार्थी (Beneficiary) नसावेत.

·          दोन्ही साक्षीदारांनी तुम्ही त्यांच्या उपस्थितीत स्वाक्षरी केल्याची नोंद म्हणून स्वाक्षरी करावी.

·          विशेषतः ज्येष्ठ नागरिक किंवा वैद्यकीय समस्या असलेल्या व्यक्तींनी मानसिक क्षमता (Mental Fitness) असल्याचे डॉक्टरांचे प्रमाणपत्र घेणे हितावह आहे.

यासाठी क्लिष्ट भाषा, महागडे वकील किंवा मोठी कायदेशीर कागदपत्रे आवश्यक नसतात. तुमची इच्छा स्पष्ट आणि कायदेशीरदृष्ट्या योग्य प्रकारे नोंदवलेली असणे हेच सर्वात महत्त्वाचे आहे.

इच्छापत्र न करण्याची सर्वसाधारण कारणे

इच्छापत्र तयार करणे सोपे असूनही अनेकजण विविध कारणांनी ते पुढे ढकलतात. त्यामागील काही सामान्य गैरसमज आणि त्यामागील वास्तव पुढीलप्रमाणे आहे.

“इच्छापत्र कर म्हणजे मी लवकर मरणार असे तुला वाटते का?”

मृत्यूबद्दल बोलणे अनेकांना अस्वस्थ वाटते. परंतु वास्तव स्वीकारून आपल्या पश्चात कुटुंबाला होणाऱ्या त्रासाचा विचार करणे हीच खरी जबाबदारी आहे.

“माझ्या मृत्यूनंतर सर्व मालमत्ता आपोआप माझ्या जोडीदारालाच मिळेल.”

हे नेहमीच खरे नसते. प्रत्येक धर्माचे उत्तराधिकाराचे कायदे वेगवेगळे असतात. उदाहरणार्थ, हिंदू उत्तराधिकार कायद्यानुसार पत्नी, मुले आणि आई यांनाही कायदेशीर वारसाहक्क असू शकतो.

“हे खूप खर्चिक आणि किचकट आहे.”

इच्छापत्र लिहिण्यास काहीही खर्च येत नाही. नोंदणी ऐच्छिक असून तिचा खर्चही तुलनेने कमी असतो. इच्छापत्र तयार करण्यासाठी वकील असणे बंधनकारक नाही.

“मी काही सोबत घेऊन जाणार नाही.”

हे खरे असले तरी इच्छापत्र नसेल तर तुमच्या कुटुंबामागे अनावश्यक गोंधळ आणि ताण राहू शकतो.

“माझी मुले इच्छापत्रासाठी आग्रह करतात म्हणजे त्यांचा डोळा माझ्या संपत्तीवर आहे.”

इच्छापत्रामुळे तुमची मालमत्तेवरील मालकी कमी होत नाही. ते तुमच्या निधनानंतरच अंमलात येते.

“घर मुलांच्या नावावर केले तर ते मला बाहेर काढतील.”

इच्छापत्र आणि जिवंतपणी मालकी हस्तांतरित करणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आयुष्यभरात घराची मालकी हस्तांतरित करण्यापूर्वी अत्यंत विचार करा.

“मला काही होणार नाही.”

जीवन अनिश्चित आहे. इच्छापत्र म्हणजे निराशावाद नव्हे, तर जबाबदार नियोजन.

“इच्छापत्र स्टॅम्प पेपरवरच किंवा नोंदणीकृतच असावे.”

ही चुकीची समजूत आहे. साध्या कागदावर लिहिलेले इच्छापत्रही वैध असते. नोंदणी ऐच्छिक असली तरी शिफारस केली जाते.

ही सर्व कारणे केवळ विलंब घडवतात. त्याचा त्रास मात्र शेवटी आपल्या प्रियजनांनाच सहन करावा लागतो.

शेवटचा विचार

इच्छापत्र हे संपत्तीबद्दल नसून जबाबदारीबद्दल आहे. तुम्ही तरुण असाल किंवा ज्येष्ठ, नोकरीत असाल किंवा व्यवसायात, गृहिणी असाल किंवा उद्योजक—तुमच्या कुटुंबासाठी स्पष्टता ठेवणे ही तुमची जबाबदारी आहे.

आजच पहिले पाऊल उचला. इच्छापत्र तयार करणे तुम्हाला वाटते त्यापेक्षा खूप सोपे आहे.

पुढील भाग

लेखमाला – भाग २ (६ पैकी)

इच्छापत्र तयार करताना समजून घ्यावयाच्या महत्त्वाच्या संज्ञा – नामनिर्देशन (Nomination), नामनिर्देशित व्यक्ती (Nominee) आणि लाभार्थी (Beneficiary).

पुढील ब्लॉगची लिंक: https://polarispilot.blogspot.com/2025/09/key-terms-in-making-will-nominations.html


Sunday, February 22, 2026

सन १९७१ च्या युद्धवीराची अनंतात भरारी

भारतीय वायुदलाच्या गाभ्याशी असलेल्या कर्तव्यदक्षता, शौर्य आणि तल्लख विनोदबुद्धी या गुणांचे एक उत्तम उदाहरण म्हणजे विंग कमांडर प्रताप मराठे. एक वर्षापूर्वी त्यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. 
एअर कमोडोर नितीन साठे (निवृत्त) यांनी ह्या लेखाद्वारे त्यांना दिलेली अखेरची सलामी.. 


विंग कमांडर प्रताप मराठे. 

 
मूळ लेख - एअर कमोडोर (निवृत्त) नितीन साठे 
अनुवाद - अश्विनी मराठे  

 

 विंग कमांडर प्रताप रामचंद्र मराठे यांना १९५८ च्या डिसेंबर महिन्यात भारतीय वायुदलात फायटर पायलट म्हणून कमिशन मिळाले. 

अगदी सुरुवातीला व्हॅम्पायर, हंटर, मिस्टीअर या लढाऊ विमानांचे प्रशिक्षण घेतल्यानंतर काही वर्षांनी सन १९६२ मध्ये त्यांनी हेलिकॉप्टर उडवण्याचे प्रशिक्षण घेतले आणि सलामीलाच त्यांना चीनविरुद्धच्या युध्दात कामगिरीवर पाठवण्यात आले. ईशान्य भागातील सीमावर्ती प्रदेशात त्यांनी जखमी सैनिकांना युध्दभूमीतून परत घेऊन येणे, रसद पुरवठा करणे अशा मोहिमा पार पाडल्या.
सन १९७१ मध्ये एआरसी (Aviation Research Centre) मध्ये पोस्टिंगवर असताना, त्या वेळी तिशीत असणारे मराठे तेव्हाच्या पूर्व पाकिस्तानच्या सीमेवर तैनात होते. ए आर सी (Aviation Research Centre) ही R&AW म्हणजेच ‘रिसर्च अँड अनॅलिसिस विंग’ची हवाई शाखा आहे आणि सन १९७१ च्या युद्धातील ह्या संस्थेच्या भूमिकेची तपशीलवार नोंद अनेक कारणांनी झालेली नाही.


मराठे यांच्या Mi-4 हेलिकॉप्टरच्या साथीने त्यांनी चितगाव हिल्समध्ये पाकिस्तानी सैन्याच्या पलीकडे आपले स्पेशल फ्रॉन्टियर फोर्सचे (SFF) कमांडो पोचवले आणि त्यानंतर त्या कमांडोंना युद्ध सामग्री आणि रसद पुरवठा करणे आणि जखमींना परत आणणे या मोहिमांचे नेतृत्व केले.


बांगलादेशचा जन्म ज्यातून झाला त्या सन १९७१ च्या मोहिमेच्या काळातील विंग कमांडर मराठे यांच्या कामगिरीबद्दल त्यांना ‘Mention in Dispatches’ हा बहुमान प्राप्त झाला. 


पुढे १९७९ मध्ये त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि त्यानंतर १९८८ ते १९९४ ही सहा वर्षे पुनश्च एकवार वायुदलात सेवा दिली. 


त्या विंग कमांडर मराठे यांची ही विलक्षण कहाणी.

फोटो - विंग कमांडर प्रताप मराठे त्यांच्या हेलिकॉप्टरसोबत.

 ‘ये पाकिस्तानी आप को इतना तंग कर रहे हैं… क्या आप इन से नहीं लड़ोगे? ‘ आगरताळ्याला  सीमेवर तैनात असलेल्या भारतीय बॉर्डर सिक्युरिटी फोर्स (BSF) च्या अधिकाऱ्याने सीमेपलीकडून येणाऱ्या निर्वासितांपैकी एकाला विचारले. तो बंगालीत उत्तरला, ‘पंजाबी तो बिराट मानुष. आमी तो ओल्पो (अल्प). ओल्पो की जुद्धो कोरे?’ (पंजाबी लोक किती हट्टेकट्टे असतात! आम्ही छोटे आहोत. छोटे लोक काय युद्ध करणार?’


“बांगला निर्वासितांच्या रांगाच्या रांगा सीमा पार करून भारतात येत होत्या, आणि आकाशातून आम्हाला दिसत होती त्या बाजूला मैलोनमैल पसरलेली जळती खेडी आणि प्रचंड जनसमुदाय!” गप्पांच्या सुरुवातीलाच मराठे म्हणाले. आता ते वयपरत्वे अंथरुणाला खिळलेले असले, तरी त्यांच्यात एक प्रकारचे सैनिकी चैतन्य अजूनही जिवंत होते. त्यांच्या चेहऱ्याला अर्धाअधिक झाकून टाकणाऱ्या हँडलबार मिशांच्या मागून त्यांचे डोळे मिश्किलपणे लुकलुकत होते. त्यांची पूर्वपरवानगी घेऊन मी त्यांच्याशी गप्पा मारण्यासाठी त्यांच्या घरी गेलो होतो. 


त्यांच्या खोलीत शिरताच मी त्यांना माझी ओळख करून दिली. “सर, निवृत्तीपूर्वी तुमचं जेव्हा पुण्याला पोस्टिंग होतं तेव्हा तुमच्याबरोबर फ्लाइंग करण्याची संधी मला मिळाली होती!” मी म्हणालो. प्रसन्न हसून त्यांनी मला खुणेने आत बोलावलं. ‘ऑफ कोर्स, माझ्या लक्षात आहे! त्याकाळी पुण्यात डेस्क जॉब करत असताना मला तो फ्लाइंगचा सराव मिळणं ही खूप चांगली गोष्ट होती!’ त्यांच्या तल्लख स्मरणशक्तीचे मला फार कौतुक वाटले. 


सेवानिवृत दीर्घानुभवी वैमानिक विंग कमांडर प्रताप रामचंद्र मराठे यांनी  सन १९७१ च्या युद्धात कळीची भूमिका बजावली होती. आता त्यांच्या राष्ट्रसेवेबद्दल बोलणे सुरू झाल्यावर त्यांचे डोळे एका वेगळ्याच ऊर्जेने चमकू लागले.


 सन १९७१ चा मे महिना. स्क्वॉड्रन लीडर मराठेंची नेमणूक कटक (ओदिशा) जवळच्या चारबटिया तळावर झाली होती. इथेच एव्हिएशन रिसर्च सेंटर’ ही संघटना रॉ म्हणजेच ‘रिसर्च ॲन्ड ॲनॅलिसिस विंग’ ह्या छुप्या गुप्त संस्थेच्या खाली कार्यरत होती. सुप्रसिद्ध श्री. आर एन काओ तिचे प्रमुख होते. पाकिस्तानी सैन्याला कमकुवत करण्यासाठी आणि जेव्हा युद्ध सुरू होईल तेव्हा त्यांची माघार थोपवण्यासाठी स्पेशल फ्राँटियर फोर्सच्या तिबेटी जवानांना काओ यांच्या नेतृत्वाखाली चितगांवच्या डोंगराळ प्रदेशात खास गुरिला वॉरफेअरच्या कामगिऱ्यांवर पाठवता येईल का ह्याचा अभ्यास करण्याची कामगिरी पंतप्रधान इंदिरा गांधींनी श्री काओ यांच्यावर सोपवली.   
 
त्यापूर्वी सन १९६२ च्या चीन विरुद्धच्या युद्धापूर्वी ‘युनिट 22’ उर्फ ‘टू टूज’ ची स्थापना झाली होती .  ह्या युनिटचे इन्सपेक्टर जनरल होते ब्रिगेडियर (पुढे मेजर जनरल) सुजनसिंग उबान. चिनी आक्रमणाविरुद्ध लढणाऱ्या तिबेटी सैनिकांच्या मदतीने तिबेट मुक्त करण्याची विशिष्ट कामगिरी ह्या युनिटवर होती आणि त्यासाठी त्यांना प्रशिक्षण दिले गेले होते. सन १९७१ पर्यंत ह्या युनिट मधील जवानांची संख्या वाढत जाऊन ५००० च्या आसपास झाली होती पण आता त्या युनिटला काही कामगिरी दिली जात नव्हती.

 युनिट 22 मधील सैनिक युनिटच्या प्रमुख (व एकमेव) कामगिरीसाठी म्हणजेच चीनच्या ताब्यातून तिबेटला मुक्त करण्यासाठीच वापरले जावेत असे युनिटमधील तिबेटी ऑफिसर्सचे मत होते आणि भारता’साठी’ युद्धात पडण्याची त्यांची इच्छा नव्हती. परंतु धरमशालाहून दलाई लामा यांचा स्पष्ट आदेश आल्याने ह्या सैनिकांना मुक्तिबाहिनीच्या बरोबरीने प्रशिक्षण दिले गेले आणि त्यांना १९७१ सालच्या सुरुवातीला बांगलादेशात पाठवण्यात आले.
यापैकी तीन कंपनीज ( ४०० ते ५०० सैनिक) शत्रूच्या हद्दीत दोन Mi-4 हेलिकॉप्टर्समधून एअरड्रॉप केल्या गेल्या. ह्या हेलिकॉप्टर्सचे वैमानिक होते स्क्वॉड्रन लीडर मराठे आणि फ्लाइट लेफ्टनंट परवेझ रुस्तम जामसजी. दोघांचेही ह्या हेलिकॉप्टरवर नैपुण्य होते आणि मराठेंनी तर ईशान्य भागात चीनविरुद्धच्या युद्धातही फ्लाइंग केलेले होते.


ब्रिगेडियर उबान हे थेट पंतप्रधान कार्यालयाच्या आदेशानुसार स्वतंत्रपणे कार्यरत होते. ते त्यांच्या युनि ला (युनिट २२) ‘फिफ्थ आर्मी’ असे संबोधत असत. जनरल सॅम माणेकशॉ यांच्या नेतृत्वाखालील भारतीय सैन्याला त्यांनी सहकार्य देऊ केले. ह्या त्यांच्या कृतीमुळे काहीसे  नाराजीचे वातावरण निर्माण झाले आणि ते  सैन्यात खालपर्यंत झिरपले.

सन १९७१ च्या मे महिन्यात मराठे आणि त्याचे Mi-4 यांना आगरताळा येथे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स मुख्यालयात पाठवले गेले. ब्रिगेडियर बी सी पांडे हे त्या वेळी तिथले प्रमुख होते. सीमावर्ती भागात हवाई पाहणी (reconaissance) करण्यासाठी ह्या हेलिकॉप्टरचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला.


“आगरताळ्याला मी असताना पाकिस्तानी 14 स्क्वॉड्रनचे काही फाइटर पायलट मला भेटले. हे बंगाली भाषिक  पायलट (तेव्हाचा पूर्व पाकिस्तान) आपल्याला येऊन मिळालेले  होते. माझ्या माहितीप्रमाणे, पुढे ह्या पायलट्स् ना आपण चेतक हे हेलिकॉप्टर आणि कॅरिबू हे ट्रान्स्पोर्ट विमान उडवण्याचे प्रशिक्षण दिले.”

“नोव्हेंबरच्या शेवटाकडे मला मिझो पर्वतराजीमधील लुंगलेई हवाई तळावर पाठवण्यात आलं. हा तळ चितगाव पर्वतरांगांच्या आमनेसामने होता. फ्लाइट लेफ्टनंट जमासजी तिथे आधीपासून होता, आणि स्पेशल फ्रॉन्टियर फोर्स च्या जवानांना शत्रूच्या सीमावर्ती सैन्याच्या मागील बाजूला ड्रॉप करण्यासाठी मला त्याच्याबरोबर काम करायचं होतं.”

जिथे हे ड्रॉप्स करायचे, तो भाग (ड्रॉप झोन) पूर्व पाकिस्तानच्या सीमेच्या पलीकडे पन्नासएक किलोमीटर अंतरावर असलेल्या कापटाई धरणाजवळ होता. ह्या धरणाच्या आजूबाजूला असलेल्या पाकिस्तानी ३३ एस एस जी कमांडो बटालीयनचा बीमोड करून टाकण्याची कामगिरी ड्रॉप केलेल्या कमांडोजवर सोपवलेली होती.

पहिल्या दिवशी दोन्ही हेलिकॉप्टरच्या पाच खेपा ठरल्या होत्या. सुमारे ऐंशी सैनिक आणि त्यांचे युध्द साहित्य पलीकडे ड्रॉप करायचे होते. 

“आम्ही पहिला ड्रॉप केला आणि दुसऱ्या ड्रॉप सॉर्टी दरम्यान ड्रॉप झोन मधल्या एस एफ एफ जवनांकडून संदेश आला की पाकिस्तानी लष्कर त्यांच्यावर दारुगोळ्याचा वर्षाव करत आहे, त्यामुळे पुढचा ड्रॉप करण्यापूर्वी आम्ही परिस्थिति सुधारण्याची वाट पहावी.”

मराठेंनी हेलिकॉप्टर परत फिरवले. ड्रॉप करत असताना जामसजीवर मात्र जबरदस्त हल्ला झाला. हेलिकॉप्टरच्या रडर पेडल्स मधून आत घुसलेली एक गोळी जामसजीच्या पोटरीला चाटून गेली. रक्तबंबाळ झालेल्या जामसजीने गोळ्या घुसलेले त्याचे हेलिकॉप्टर लुंगलेई तळावर परत आणले. त्याच्या जखमेवर प्रथमोपचार करण्यात आले. 

सुदैवाने हेलिकॉप्टरचे फार नुकसान झाले नव्हते आणि थोड्या दुरुस्तीनंतर ते ठीकठाक झाले. जखमी झाला म्हणून हार मानणाऱ्यातला जामसजी नव्हता. पुढच्या मोहिमेसाठी हेलिकॉप्टर तयार होताक्षणी तोही कॉकपिटमध्ये हजर झाला. 

जामसजीने दाखवलेले शौर्य आणि कर्तव्यदक्षता याबद्दल राष्ट्रपति पुरस्कारासाठी मी त्याच्या नावाची शिफारस केली. तिकडे ‘एस एफ एफ’नेही त्याचसाठी त्याची शिफारस केली होती!” फ्लाइट लेफ्टनंट जामसजीला पुढील वर्षी प्रजासत्ताक दिनी वीर चक्राने सन्मानित करण्यात आले.
ह्या युध्दात एसएफएफला दारूगोळा आणि रसद पुरवणे आणि चितगाव हिल्स मधील युद्धात जखमी झालेल्या सैनिकांना परत घेऊन येणे ह्या जबाबदाऱ्या आमच्यावर होत्या.”ह्या दोन्ही Mi-4 हेलिकॉप्टर्सनी संपूर्ण युध्दकाळात भरपूर  फ्लाइंग केले. चितगाव पडल्यानंतर भारतीय सैन्य आणि मुक्तिबाहिनी यांनी चितगाव विमानतळाचा ताबा घेतला. तेव्हा ह्या दोघा ऑफिसर्सना तिथे पाठवण्यात आले. १६ डिसेंबर १९७१ च्या पाकिस्तानच्या शरणागतीनंतर ते दोघे परत आले.

युद्ध संपल्यावर अनेक दिवस चितगावमधील जळत्या इंधनाच्या साठयांच्या ज्वाळा अनेक मैलांवरून सुद्धा दिसत असत. चितगाव शहरातून मी हिंडत असताना एक दिवस तिथे मला अचानक माझा दूरचा मावसभाऊ कमांडर उत्फुल डबीर हा भेटला! तो भारतीय नौदलाच्या एका  जहाजाचा कॅप्टन होता आणि चितगाव बंदराच्या नाकेबंदीच्या कामगिरीवर तिथे होता. युद्धातल्या त्याच्या कामगिरीबद्दल त्याला पुढे नौसेना पदकाने सन्मानित केले गेले. आम्ही दोघांनी आमच्या कुटुंबियांसाठी बरोबर नेण्यासाठी थोडी खरेदी केली. तिथे छानसे जूटचे गालिचे आणि काही इंपोर्टेड वस्तू आम्हाला खूप स्वस्तात मिळाल्या. विलायतेतून आलेले दूध पावडरचे डबे खरेदी केल्याचंही आठवतं.”

“Mi-4 हे हेलिकॉप्टर अगदी साधं पण अत्यंत भरवशाचं असं हेलिकॉप्टर होतं. नॅविगेशन साठी त्यात फक्त एक रेडियो कंपास होता. ज्या रेडियो फ्रिक्वेन्सीला आपण रेडियो ट्यून करू त्या ट्रान्समिटरची दिशा रेडियो कंपासची सुई दर्शवत असे. हवामान वाईट असेल तर हा रेडियो कंपास आमच्या फार उपयोगी पडे. अनेकदा आम्ही त्यावर ऑल इंडिया रेडियो ट्यून करून त्या आधारे आपल्या हद्दीत सुखरूप परतलो आहोत. ड्रॉप झोन्स मध्ये सैनिक आणि सामग्री कमीत कमी वेळात ड्रॉप करता यावी म्हणून आम्ही हेलिकॉप्टरचे मागील दोन्ही दरवाजे काढून टाकत असू. मात्र त्यामुळे फ्लाइंग करताना आवाजाची पातळी फार मोठी असे. आम्हाला कोणत्याही क्षणी फ्लाइंग साठी हेलिकॉप्टर उपलब्ध व्हावे अश्या रीतीने त्यांची दुरुस्ती आणि देखभाल करण्यात आमचा (वायुदलातून निवृत्त सैनिकांचा) ग्राउंड क्रू निष्णात होता.”

युद्धक्षेत्रात माझं पोस्टिंग असताना अनेक प्रसिद्ध व्यक्तींना भेटण्याची संधि मला मिळाली - जनरल जे एफ आर जेकब, जनरल सगत सिंह, श्री के एन राव… ही सगळी प्रभावी व्यक्तिमत्त्वे होती आणि त्यांची भेट आम्हाला स्फूर्तिदायक ठरत असे.
युद्ध संपले आणि शरणागतीचा करार झाला त्यानंतरची काही वर्षे आमचे एक हेलिकॉप्टर कायमस्वरूपी ढाक्का इथे ठेवलं होतं. बांगलादेश सेनेच्या बराक्स मध्ये आम्ही राहत असू आणि जिथे जाऊ तिथे आमचे अत्यंत आदराने आणि उत्साहाने स्वागत होत असे. सन १९७५ मध्ये, शेख मुजीब यांची हत्या झाल्यानंतर भारताने बांगलादेशातून आपले सैन्य मागे घेतले.”

बांगलादेशचे पहिले राष्ट्राध्यक्ष शेख मुजीबुर्रहमान पाकिस्तानी कैदेतून सुटून  सन १९७२ मध्ये बांगलादेशात परतले आणि त्यानंतर लौकरच त्यांनी त्यांच्या गावाला भेट दिली. बांग्लादेशातील गोपालगंज जिल्ह्यातल्या तुंगीपारा ह्या त्यांच्या गावी त्यांना आम्ही हेलिकॉप्टर मधून नेले होते. त्या वेळी त्यांच्या पत्नी बेगम फजेलातुन्नेसा यांचीही भेट झाली. त्यांच्या घरी आम्हाला मिळालेली राजेशाही वागणूक आणि त्यांनी आम्हाला दिलेली अत्यंत स्वादिष्ट चिकनची मेजवानी अजून स्मरणात  आहे.”

आमच्या गप्पा चांगल्या तासभर रंगल्या होत्या. आता मात्र मराठे थकलेले दिसत होते. मी आटोपते घेण्याचे ठरवले.

आणखी एकच प्रश्न, सर! चारबटियाला घरी असलेल्या कुटुंबियांबद्दल सांगा ना!”

आमचा बेस बरोबर संपर्क होई त्या त्या वेळी मी त्यांच्यामार्फत एक ‘ऑल वेल’ चा निरोप घरी पाठवत असे. घरच्यांनी फार काळजी करू नये हा हेतू. पण थांबा, तुम्ही ह्याबद्दल माझ्या पत्नीलाच विचारा ना!” असे म्हणून हसत हसत त्यांनी आपल्या पत्नीला हाक मारली. प्रसन्न मुद्रेने सौ सुहासिनी मराठे यांनी खोलीत प्रवेश केला आणि पतीकडे निरतिशय प्रेमाने पाहून त्या म्हणाल्या, ”हे कुठे जात आणि काय कामगिरीवर असत त्याबद्दल मला कधीच सांगत नसत आणि मीही कधी त्यांना त्याबद्दल विचारत नसे. ते कुठल्या तरी महत्त्वाच्या कामगिरीवर असणार हे मला ठाऊक होतं. अश्या कामगिरीसाठीच तर त्यांना एनडीए (राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी, खडकवासला) पासूनच ट्रेनिंग मिळालेलं होतं. मला त्यांचा अत्यंत अभिमान वाटत असे, आणि अजूनही वाटतो!”

विमाने आणि वैमानिक युध्दावर गेले की आम्ही बायका एकत्र जमून त्यांच्यासाठी फराळ बनवत असू. त्यांचे मनोधैर्य कायम राहावे म्हणून आमचा आपला एक छोटासा प्रयत्न! सन १९७१ च्या ३१ डिसेंबरला जेव्हा हे चारबटियाला परतले तेव्हा नववर्षाच्या स्वागतासाठी फॅन्सी ड्रेस पार्टी सुरू होती. ते वेळेत पोहोचतील का नाही, काहीच माहीत नव्हते. सुदैवाने, हे वेळेत पोहोचले. आले ते फॅन्सी ड्रेस करूनच!

प्रताप ह्या पार्टीसाठी मुक्तिबाहिनी सैनिकाच्या वेशात आले होते. वाढलेली दाढी, अंगात फाटका कुडता आणि नेसूला मळकट लुंगी. कमरेभोवती काडतुसांचा चामड्याचा पट्टा. अगदी मूर्तिमंत बांगलादेशी योद्धा! मग पार्टीत नृत्य करत असताना अचानक ‘ह्यां’नी सगळ्या बायकांसमक्ष आपली लुंगी सोडून टाकली हो! सगळ्या बायका धसक्याने किंचाळायला लागल्या! अर्थात ह्यांनी लुंगीखाली पॅन्ट घातलेलीच होती म्हणा!” सुहासिनीबाई हसत हसत सांगत होत्या.

आम्ही सगळेच खळखळून हसत होतो, तितक्यात विंग कमांडर मराठ्यांना आणखी एक किस्सा आठवला. मध्यंतरी त्यांचा थकवा नाहीसा झालेला दिसत होता.

शरणागतीच्या एखादा दिवस आधीची गोष्ट. आम्ही चितगाव हवाई तळावर  निवांत बसलो होतो. पाकिस्तानात काय चालू आहे ह्याची माहिती मिळत राहावी म्हणून आम्ही आमचा रेडियो पाकिस्तानी फ्रिक्वेन्सीला लावून ठेवला होता. डिसेंबरच्या उबदार उन्हात चितगावमध्ये बसून आम्ही मजेत चहा बिस्किटांचा आस्वाद घेत असताना रेडियोवर पाकिस्तानी राष्ट्राध्यक्ष जनरल याह्या खान यांचे त्यांच्या सैनिकांना उद्देशून भाषण चालू होते. बुलंद आवाजात त्यांनी वल्गना केली - “चितगाव में घमासान लडाई हो रही है; और हम हिंदुस्तानियोंको कुचल रहे हैं!”

आता काय म्हणणार!”

विंग कमांडर मराठे यांच्या निष्ठेची, शौर्याची आणि विनोदबुद्धीची ही कहाणी म्हणजे भारतीय वायुसेनेच्या गाभ्याचे जणू लखलखते उदहरणच! नोंद नसलेल्या पराक्रमांची आणि अनाम वीरांनी केलेल्या त्यागाची आठवण अशा कहाण्या आपल्याला करून देतात.

केवळ इतिहासाच्या पानांतच नाही तर त्यांच्या सहकाऱ्यांच्या स्मृतींतही विंग कमांडर मराठे यांचा वारसा कायम राहील.

 

फोटो- विंग कमांडर मराठे पत्नी सुहासिनी यांच्यासह

 

 

 


प्रत्येकाने इच्छापत्र का तयार करावे? – इच्छापत्राची मूलभूत माहिती आणि त्याचे महत्त्व (भाग १)

  प्रत्येकाने इच्छापत्र का तयार करावे? – इच्छापत्र म्हणजे काय, ते का आवश्यक आहे आणि कोणासाठी आहे? इच्छापत्र म्हणजे काय? ते कोणासाठी आवश्...