भारतीय वायुदलाच्या गाभ्याशी असलेल्या कर्तव्यदक्षता, शौर्य आणि तल्लख विनोदबुद्धी या गुणांचे एक उत्तम उदाहरण म्हणजे विंग कमांडर प्रताप मराठे. एक
वर्षापूर्वी त्यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
एअर कमोडोर नितीन साठे (निवृत्त) यांनी ह्या लेखाद्वारे त्यांना दिलेली अखेरची सलामी..
विंग कमांडर प्रताप मराठे. |
मूळ लेख - एअर कमोडोर (निवृत्त) नितीन साठे
अनुवाद - अश्विनी मराठे
विंग कमांडर प्रताप रामचंद्र मराठे यांना १९५८ च्या डिसेंबर महिन्यात भारतीय वायुदलात फायटर पायलट म्हणून कमिशन मिळाले.
अगदी सुरुवातीला व्हॅम्पायर, हंटर, मिस्टीअर या लढाऊ विमानांचे प्रशिक्षण घेतल्यानंतर काही वर्षांनी सन १९६२ मध्ये त्यांनी हेलिकॉप्टर उडवण्याचे प्रशिक्षण घेतले आणि सलामीलाच त्यांना चीनविरुद्धच्या युध्दात कामगिरीवर पाठवण्यात आले. ईशान्य भागातील सीमावर्ती प्रदेशात त्यांनी जखमी सैनिकांना युध्दभूमीतून परत घेऊन येणे, रसद पुरवठा करणे अशा मोहिमा पार पाडल्या.
सन १९७१ मध्ये एआरसी (Aviation Research Centre) मध्ये पोस्टिंगवर असताना, त्या वेळी तिशीत असणारे मराठे तेव्हाच्या पूर्व पाकिस्तानच्या सीमेवर तैनात होते. ए आर सी (Aviation Research Centre) ही R&AW म्हणजेच ‘रिसर्च अँड अनॅलिसिस विंग’ची हवाई शाखा आहे आणि सन १९७१ च्या युद्धातील ह्या संस्थेच्या भूमिकेची तपशीलवार नोंद अनेक कारणांनी झालेली नाही.
मराठे यांच्या Mi-4 हेलिकॉप्टरच्या साथीने त्यांनी चितगाव हिल्समध्ये पाकिस्तानी सैन्याच्या पलीकडे आपले स्पेशल फ्रॉन्टियर फोर्सचे (SFF) कमांडो पोचवले आणि त्यानंतर त्या कमांडोंना युद्ध सामग्री आणि रसद पुरवठा करणे आणि जखमींना परत आणणे या मोहिमांचे नेतृत्व केले.
बांगलादेशचा जन्म ज्यातून झाला त्या सन १९७१ च्या मोहिमेच्या काळातील विंग कमांडर मराठे यांच्या कामगिरीबद्दल त्यांना ‘Mention in Dispatches’ हा बहुमान प्राप्त झाला.
पुढे १९७९ मध्ये त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि त्यानंतर १९८८ ते १९९४ ही सहा वर्षे पुनश्च एकवार वायुदलात सेवा दिली.
त्या विंग कमांडर मराठे यांची ही विलक्षण कहाणी.
| फोटो - विंग कमांडर प्रताप मराठे त्यांच्या हेलिकॉप्टरसोबत. |
‘ये पाकिस्तानी आप को इतना तंग कर रहे हैं… क्या आप इन से नहीं लड़ोगे? ‘ आगरताळ्याला सीमेवर तैनात असलेल्या भारतीय बॉर्डर सिक्युरिटी फोर्स (BSF) च्या अधिकाऱ्याने सीमेपलीकडून येणाऱ्या निर्वासितांपैकी एकाला विचारले. तो बंगालीत उत्तरला, ‘पंजाबी तो बिराट मानुष. आमी तो ओल्पो (अल्प). ओल्पो की जुद्धो कोरे?’ (पंजाबी लोक किती हट्टेकट्टे असतात! आम्ही छोटे आहोत. छोटे लोक काय युद्ध करणार?’
“बांगला निर्वासितांच्या रांगाच्या रांगा सीमा पार करून भारतात येत होत्या, आणि आकाशातून आम्हाला दिसत होती त्या बाजूला मैलोनमैल पसरलेली जळती खेडी आणि प्रचंड जनसमुदाय!” गप्पांच्या सुरुवातीलाच मराठे म्हणाले. आता ते वयपरत्वे अंथरुणाला खिळलेले असले, तरी त्यांच्यात एक प्रकारचे सैनिकी चैतन्य अजूनही जिवंत होते. त्यांच्या चेहऱ्याला अर्धाअधिक झाकून टाकणाऱ्या हँडलबार मिशांच्या मागून त्यांचे डोळे मिश्किलपणे लुकलुकत होते. त्यांची पूर्वपरवानगी घेऊन मी त्यांच्याशी गप्पा मारण्यासाठी त्यांच्या घरी गेलो होतो.
त्यांच्या खोलीत शिरताच मी त्यांना माझी ओळख करून दिली. “सर, निवृत्तीपूर्वी तुमचं जेव्हा पुण्याला पोस्टिंग होतं तेव्हा तुमच्याबरोबर फ्लाइंग करण्याची संधी मला मिळाली होती!” मी म्हणालो. प्रसन्न हसून त्यांनी मला खुणेने आत बोलावलं. ‘ऑफ कोर्स, माझ्या लक्षात आहे! त्याकाळी पुण्यात डेस्क जॉब करत असताना मला तो फ्लाइंगचा सराव मिळणं ही खूप चांगली गोष्ट होती!’ त्यांच्या तल्लख स्मरणशक्तीचे मला फार कौतुक वाटले.
सेवानिवृत दीर्घानुभवी वैमानिक विंग कमांडर प्रताप रामचंद्र मराठे यांनी सन १९७१ च्या युद्धात कळीची भूमिका बजावली होती. आता त्यांच्या राष्ट्रसेवेबद्दल बोलणे सुरू झाल्यावर त्यांचे डोळे एका वेगळ्याच ऊर्जेने चमकू लागले.
सन १९७१ चा मे महिना. स्क्वॉड्रन लीडर मराठेंची नेमणूक कटक (ओदिशा) जवळच्या चारबटिया तळावर झाली होती. इथेच एव्हिएशन रिसर्च सेंटर’ ही संघटना रॉ म्हणजेच ‘रिसर्च ॲन्ड ॲनॅलिसिस विंग’ ह्या छुप्या गुप्त संस्थेच्या खाली कार्यरत होती. सुप्रसिद्ध श्री. आर एन काओ तिचे प्रमुख होते. पाकिस्तानी सैन्याला कमकुवत करण्यासाठी आणि जेव्हा युद्ध सुरू होईल तेव्हा त्यांची माघार थोपवण्यासाठी स्पेशल फ्राँटियर फोर्सच्या तिबेटी जवानांना काओ यांच्या नेतृत्वाखाली चितगांवच्या डोंगराळ प्रदेशात खास गुरिला वॉरफेअरच्या कामगिऱ्यांवर पाठवता येईल का ह्याचा अभ्यास करण्याची कामगिरी पंतप्रधान इंदिरा गांधींनी श्री काओ यांच्यावर सोपवली.
त्यापूर्वी सन १९६२ च्या चीन विरुद्धच्या युद्धापूर्वी ‘युनिट 22’ उर्फ ‘टू टूज’ ची स्थापना झाली होती . ह्या युनिटचे इन्सपेक्टर जनरल होते ब्रिगेडियर (पुढे मेजर जनरल) सुजनसिंग उबान. चिनी आक्रमणाविरुद्ध लढणाऱ्या तिबेटी सैनिकांच्या मदतीने तिबेट मुक्त करण्याची विशिष्ट कामगिरी ह्या युनिटवर होती आणि त्यासाठी त्यांना प्रशिक्षण दिले गेले होते. सन १९७१ पर्यंत ह्या युनिट मधील जवानांची संख्या वाढत जाऊन ५००० च्या आसपास झाली होती पण आता त्या युनिटला काही कामगिरी दिली जात नव्हती.
युनिट 22 मधील सैनिक युनिटच्या प्रमुख (व एकमेव) कामगिरीसाठी म्हणजेच चीनच्या ताब्यातून तिबेटला मुक्त करण्यासाठीच वापरले जावेत असे युनिटमधील तिबेटी ऑफिसर्सचे मत होते आणि भारता’साठी’ युद्धात पडण्याची त्यांची इच्छा नव्हती. परंतु धरमशालाहून दलाई लामा यांचा स्पष्ट आदेश आल्याने ह्या सैनिकांना मुक्तिबाहिनीच्या बरोबरीने प्रशिक्षण दिले गेले आणि त्यांना १९७१ सालच्या सुरुवातीला बांगलादेशात पाठवण्यात आले.
यापैकी तीन कंपनीज ( ४०० ते ५०० सैनिक) शत्रूच्या हद्दीत दोन Mi-4 हेलिकॉप्टर्समधून एअरड्रॉप केल्या गेल्या. ह्या हेलिकॉप्टर्सचे वैमानिक होते स्क्वॉड्रन लीडर मराठे आणि फ्लाइट लेफ्टनंट परवेझ रुस्तम जामसजी. दोघांचेही ह्या हेलिकॉप्टरवर नैपुण्य होते आणि मराठेंनी तर ईशान्य भागात चीनविरुद्धच्या युद्धातही फ्लाइंग केलेले होते.
ब्रिगेडियर उबान हे थेट पंतप्रधान कार्यालयाच्या आदेशानुसार स्वतंत्रपणे कार्यरत होते. ते त्यांच्या युनि ला (युनिट २२) ‘फिफ्थ आर्मी’ असे संबोधत असत. जनरल सॅम माणेकशॉ यांच्या नेतृत्वाखालील भारतीय सैन्याला त्यांनी सहकार्य देऊ केले. ह्या त्यांच्या कृतीमुळे काहीसे नाराजीचे वातावरण निर्माण झाले आणि ते सैन्यात खालपर्यंत झिरपले.
“आगरताळ्याला मी असताना पाकिस्तानी 14 स्क्वॉड्रनचे काही फाइटर पायलट मला भेटले. हे बंगाली भाषिक पायलट (तेव्हाचा पूर्व पाकिस्तान) आपल्याला येऊन मिळालेले होते. माझ्या माहितीप्रमाणे, पुढे ह्या पायलट्स् ना आपण चेतक हे हेलिकॉप्टर आणि कॅरिबू हे ट्रान्स्पोर्ट विमान उडवण्याचे प्रशिक्षण दिले.”
“नोव्हेंबरच्या शेवटाकडे मला मिझो पर्वतराजीमधील लुंगलेई हवाई तळावर पाठवण्यात आलं. हा तळ चितगाव पर्वतरांगांच्या आमनेसामने होता. फ्लाइट लेफ्टनंट जमासजी तिथे आधीपासून होता, आणि स्पेशल फ्रॉन्टियर फोर्स च्या जवानांना शत्रूच्या सीमावर्ती सैन्याच्या मागील बाजूला ड्रॉप करण्यासाठी मला त्याच्याबरोबर काम करायचं होतं.”
जिथे हे ड्रॉप्स करायचे, तो भाग (ड्रॉप झोन) पूर्व पाकिस्तानच्या सीमेच्या पलीकडे पन्नासएक किलोमीटर अंतरावर असलेल्या कापटाई धरणाजवळ होता. ह्या धरणाच्या आजूबाजूला असलेल्या पाकिस्तानी ३३ एस एस जी कमांडो बटालीयनचा बीमोड करून टाकण्याची कामगिरी ड्रॉप केलेल्या कमांडोजवर सोपवलेली होती.
पहिल्या दिवशी दोन्ही हेलिकॉप्टरच्या पाच खेपा ठरल्या होत्या. सुमारे ऐंशी सैनिक आणि त्यांचे युध्द साहित्य पलीकडे ड्रॉप करायचे होते.
“आम्ही पहिला ड्रॉप केला आणि दुसऱ्या ड्रॉप सॉर्टी दरम्यान ड्रॉप झोन मधल्या एस एफ एफ जवनांकडून संदेश आला की पाकिस्तानी लष्कर त्यांच्यावर दारुगोळ्याचा वर्षाव करत आहे, त्यामुळे पुढचा ड्रॉप करण्यापूर्वी आम्ही परिस्थिति सुधारण्याची वाट पहावी.”
मराठेंनी हेलिकॉप्टर परत फिरवले. ड्रॉप करत असताना जामसजीवर मात्र जबरदस्त हल्ला झाला. हेलिकॉप्टरच्या रडर पेडल्स मधून आत घुसलेली एक गोळी जामसजीच्या पोटरीला चाटून गेली. रक्तबंबाळ झालेल्या जामसजीने गोळ्या घुसलेले त्याचे हेलिकॉप्टर लुंगलेई तळावर परत आणले. त्याच्या जखमेवर प्रथमोपचार करण्यात आले.
सुदैवाने हेलिकॉप्टरचे फार नुकसान झाले नव्हते आणि थोड्या दुरुस्तीनंतर ते ठीकठाक झाले. जखमी झाला म्हणून हार मानणाऱ्यातला जामसजी नव्हता. पुढच्या मोहिमेसाठी हेलिकॉप्टर तयार होताक्षणी तोही कॉकपिटमध्ये हजर झाला.
“जामसजीने
दाखवलेले शौर्य आणि कर्तव्यदक्षता याबद्दल राष्ट्रपति पुरस्कारासाठी मी त्याच्या
नावाची शिफारस केली. तिकडे ‘एस एफ एफ’नेही त्याचसाठी त्याची शिफारस केली होती!”
फ्लाइट लेफ्टनंट जामसजीला पुढील वर्षी प्रजासत्ताक दिनी वीर चक्राने सन्मानित
करण्यात आले.
“ह्या युध्दात
एसएफएफला दारूगोळा आणि रसद पुरवणे आणि चितगाव हिल्स मधील युद्धात जखमी झालेल्या
सैनिकांना परत घेऊन येणे ह्या जबाबदाऱ्या आमच्यावर होत्या.”ह्या दोन्ही Mi-4
हेलिकॉप्टर्सनी
संपूर्ण युध्दकाळात भरपूर फ्लाइंग केले.
चितगाव पडल्यानंतर भारतीय सैन्य आणि मुक्तिबाहिनी यांनी चितगाव विमानतळाचा ताबा
घेतला. तेव्हा ह्या दोघा ऑफिसर्सना तिथे पाठवण्यात आले. १६ डिसेंबर १९७१ च्या
पाकिस्तानच्या शरणागतीनंतर ते दोघे परत आले.
“युद्ध
संपल्यावर अनेक दिवस चितगावमधील जळत्या इंधनाच्या साठयांच्या ज्वाळा अनेक
मैलांवरून सुद्धा दिसत असत. चितगाव शहरातून मी हिंडत असताना एक दिवस तिथे मला
अचानक माझा दूरचा मावसभाऊ कमांडर उत्फुल डबीर हा भेटला! तो भारतीय नौदलाच्या एका जहाजाचा कॅप्टन होता आणि चितगाव बंदराच्या नाकेबंदीच्या
कामगिरीवर तिथे होता. युद्धातल्या त्याच्या कामगिरीबद्दल त्याला पुढे नौसेना
पदकाने सन्मानित केले गेले. आम्ही दोघांनी आमच्या कुटुंबियांसाठी बरोबर नेण्यासाठी
थोडी खरेदी केली. तिथे छानसे जूटचे गालिचे आणि काही इंपोर्टेड वस्तू आम्हाला खूप
स्वस्तात मिळाल्या. विलायतेतून आलेले दूध पावडरचे डबे खरेदी केल्याचंही आठवतं.”
“Mi-4 हे हेलिकॉप्टर
अगदी साधं पण अत्यंत भरवशाचं असं हेलिकॉप्टर होतं. नॅविगेशन साठी त्यात फक्त एक
रेडियो कंपास होता. ज्या रेडियो फ्रिक्वेन्सीला आपण रेडियो ट्यून करू त्या
ट्रान्समिटरची दिशा रेडियो कंपासची सुई दर्शवत असे. हवामान वाईट असेल तर हा रेडियो
कंपास आमच्या फार उपयोगी पडे. अनेकदा आम्ही त्यावर ऑल इंडिया रेडियो ट्यून करून
त्या आधारे आपल्या हद्दीत सुखरूप परतलो आहोत. ड्रॉप झोन्स मध्ये सैनिक आणि सामग्री
कमीत कमी वेळात ड्रॉप करता यावी म्हणून आम्ही हेलिकॉप्टरचे मागील दोन्ही दरवाजे
काढून टाकत असू. मात्र त्यामुळे फ्लाइंग करताना आवाजाची पातळी फार मोठी असे.
आम्हाला कोणत्याही क्षणी फ्लाइंग साठी हेलिकॉप्टर उपलब्ध व्हावे अश्या रीतीने
त्यांची दुरुस्ती आणि देखभाल करण्यात आमचा (वायुदलातून निवृत्त सैनिकांचा) ग्राउंड
क्रू निष्णात होता.”
“युद्धक्षेत्रात
माझं पोस्टिंग असताना अनेक प्रसिद्ध व्यक्तींना भेटण्याची संधि मला मिळाली - जनरल
जे एफ आर जेकब, जनरल सगत सिंह, श्री के एन राव… ही सगळी प्रभावी व्यक्तिमत्त्वे
होती आणि त्यांची भेट आम्हाला स्फूर्तिदायक ठरत असे.
“युद्ध संपले
आणि शरणागतीचा करार झाला त्यानंतरची काही वर्षे आमचे एक हेलिकॉप्टर कायमस्वरूपी
ढाक्का इथे ठेवलं होतं. बांगलादेश सेनेच्या बराक्स मध्ये आम्ही राहत असू आणि जिथे
जाऊ तिथे आमचे अत्यंत आदराने आणि उत्साहाने स्वागत होत असे. सन १९७५ मध्ये,
शेख मुजीब
यांची हत्या झाल्यानंतर भारताने बांगलादेशातून आपले सैन्य मागे घेतले.”
“बांगलादेशचे
पहिले राष्ट्राध्यक्ष शेख मुजीबुर्रहमान पाकिस्तानी कैदेतून सुटून सन १९७२ मध्ये बांगलादेशात परतले आणि त्यानंतर लौकरच
त्यांनी त्यांच्या गावाला भेट दिली. बांग्लादेशातील गोपालगंज जिल्ह्यातल्या
तुंगीपारा ह्या त्यांच्या गावी त्यांना आम्ही हेलिकॉप्टर मधून नेले होते. त्या
वेळी त्यांच्या पत्नी बेगम फजेलातुन्नेसा यांचीही भेट झाली. त्यांच्या घरी आम्हाला
मिळालेली राजेशाही वागणूक आणि त्यांनी आम्हाला दिलेली अत्यंत स्वादिष्ट चिकनची
मेजवानी अजून स्मरणात आहे.”
आमच्या गप्पा
चांगल्या तासभर रंगल्या होत्या. आता मात्र मराठे थकलेले दिसत होते. मी आटोपते
घेण्याचे ठरवले.
“आणखी एकच
प्रश्न, सर! चारबटियाला
घरी असलेल्या कुटुंबियांबद्दल सांगा ना!”
“आमचा बेस बरोबर
संपर्क होई त्या त्या वेळी मी त्यांच्यामार्फत एक ‘ऑल वेल’ चा निरोप घरी पाठवत
असे. घरच्यांनी फार काळजी करू नये हा हेतू. पण थांबा, तुम्ही ह्याबद्दल माझ्या
पत्नीलाच विचारा ना!” असे म्हणून हसत हसत त्यांनी आपल्या पत्नीला हाक मारली.
प्रसन्न मुद्रेने सौ सुहासिनी मराठे यांनी खोलीत प्रवेश केला आणि पतीकडे निरतिशय
प्रेमाने पाहून त्या म्हणाल्या, ”हे कुठे जात आणि काय कामगिरीवर असत त्याबद्दल मला कधीच
सांगत नसत आणि मीही कधी त्यांना त्याबद्दल विचारत नसे. ते कुठल्या तरी
महत्त्वाच्या कामगिरीवर असणार हे मला ठाऊक होतं. अश्या कामगिरीसाठीच तर त्यांना
एनडीए (राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी, खडकवासला) पासूनच ट्रेनिंग मिळालेलं होतं. मला
त्यांचा अत्यंत अभिमान वाटत असे, आणि अजूनही वाटतो!”
“विमाने आणि
वैमानिक युध्दावर गेले की आम्ही बायका एकत्र जमून त्यांच्यासाठी फराळ बनवत असू.
त्यांचे मनोधैर्य कायम राहावे म्हणून आमचा आपला एक छोटासा प्रयत्न! सन १९७१ च्या
३१ डिसेंबरला जेव्हा हे चारबटियाला परतले तेव्हा नववर्षाच्या स्वागतासाठी फॅन्सी
ड्रेस पार्टी सुरू होती. ते वेळेत पोहोचतील का नाही, काहीच माहीत नव्हते.
सुदैवाने, हे वेळेत
पोहोचले. आले ते फॅन्सी ड्रेस करूनच!
“प्रताप ह्या
पार्टीसाठी मुक्तिबाहिनी सैनिकाच्या वेशात आले होते. वाढलेली दाढी, अंगात फाटका
कुडता आणि नेसूला मळकट लुंगी. कमरेभोवती काडतुसांचा चामड्याचा पट्टा. अगदी
मूर्तिमंत बांगलादेशी योद्धा! मग पार्टीत नृत्य करत असताना अचानक ‘ह्यां’नी सगळ्या
बायकांसमक्ष आपली लुंगी सोडून टाकली हो! सगळ्या बायका धसक्याने किंचाळायला
लागल्या! अर्थात ह्यांनी लुंगीखाली पॅन्ट घातलेलीच होती म्हणा!” सुहासिनीबाई हसत
हसत सांगत होत्या.
आम्ही सगळेच
खळखळून हसत होतो, तितक्यात विंग कमांडर मराठ्यांना आणखी एक किस्सा आठवला.
मध्यंतरी त्यांचा थकवा नाहीसा झालेला दिसत होता.
“शरणागतीच्या
एखादा दिवस आधीची गोष्ट. आम्ही चितगाव हवाई तळावर निवांत बसलो होतो. पाकिस्तानात काय चालू आहे ह्याची माहिती
मिळत राहावी म्हणून आम्ही आमचा रेडियो पाकिस्तानी फ्रिक्वेन्सीला लावून ठेवला
होता. डिसेंबरच्या उबदार उन्हात चितगावमध्ये बसून आम्ही मजेत चहा बिस्किटांचा
आस्वाद घेत असताना रेडियोवर पाकिस्तानी राष्ट्राध्यक्ष जनरल याह्या खान यांचे
त्यांच्या सैनिकांना उद्देशून भाषण चालू होते. बुलंद आवाजात त्यांनी वल्गना केली -
“चितगाव में घमासान लडाई हो रही है; और हम हिंदुस्तानियोंको कुचल रहे हैं!”
आता काय
म्हणणार!”
विंग कमांडर
मराठे यांच्या निष्ठेची, शौर्याची आणि विनोदबुद्धीची ही कहाणी म्हणजे भारतीय
वायुसेनेच्या गाभ्याचे जणू लखलखते उदहरणच! नोंद नसलेल्या पराक्रमांची आणि अनाम
वीरांनी केलेल्या त्यागाची आठवण अशा कहाण्या आपल्याला करून देतात.
केवळ
इतिहासाच्या पानांतच नाही तर त्यांच्या सहकाऱ्यांच्या स्मृतींतही विंग कमांडर
मराठे यांचा वारसा कायम राहील.
| फोटो- विंग कमांडर मराठे पत्नी सुहासिनी यांच्यासह |








